मुंबई । नैसर्गिक आपत्तीच्या विविध कारणामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, राज्यात शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून यात मागील आठ महिन्यात तब्बल एक हजार १८३ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे.
शेतीसाठी कर्ज काढून शेतकरी पेरणी करून पिकांना खत पाणी देत असतो. मात्र अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले उत्पन्न शेतातून मिळत नाही. यात बळीराजा आर्थिक संकटात सापडून टोकाचा निर्णय घेत असतो. यामुळे गेल्या काही काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे.
राज्यात १४ शेतकरी आत्महत्या प्रवण जिल्हे आहे. यामध्ये विदर्भातील सहा आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे आहेत. या १४ जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतल्या जातात. त्यानुसार मागील आठ महिन्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान, कर्जबाजारीपणा, योग्य हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीच्या विविध कारणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. यात सर्वाधिक प्रमाण हे पश्चिम विदर्भात आहे.
जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांमध्ये तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ४४ शेतकरी आत्महत्या ऑगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहे. तर ११८३ शेतकरी आत्महत्यामध्ये ६०७ शेतकरी आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या. तर ३०६ शेतकरी आत्महत्या अपात्र करण्यात आल्या. आठ महिन्यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ५२० शेतकरी आत्महत्याची नोंद आहे आणि पश्चिम विदर्भात ७०७ शेतकरी आत्महत्याची नोंद आहे.















Discussion about this post