जळगाव । जळगावकरांना दिलासा देणारी एक बातमी आहे. ती म्हणजेच मागच्या काही दिवसात झालेल्या पवासामुळे जिल्ह्यातील १४ प्रकल्पांपैकी ६ मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठे गिरणा, हतनूर आणि वाघूरपैकी गिरणा ९४ टक्के, तर वाघूर ८१ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांचा पिण्याचं पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान मध्यम प्रकल्पांपैकी बोरी प्रकल्पात ९० टक्के जलसाठा झाला आहे.
जिल्ह्यातील काही भागात, नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी सहा प्रकल्प पूर्ण भरले असून, बोरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. बोरी प्रकल्पातून रात्री दहाला ९०३ क्यूसेक विसर्ग सोडला आहे, असे गिरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात मान्सूनच्या तिसऱ्या टप्प्यात बहुतांश प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून काही तालुक्यांत पावसाने उसंत घेतली आहे. पाचोरा, भडगाव, जामनेर, एरंडोल आदी तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वांत जास्त ८४ मिलिमीटर तोंडापूर, ७० मिलिमीटर बहुळा, तर त्याखालोखाल अंजनी ३४, तसेच प्रत्येकी २० मिलिमीटर हिवरा, अग्नावती प्रकल्प पाणलोट क्षेत्रासह अन्य परिसरात सरासरी २३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान गिरणा प्रकल्पात ९३.५५ टक्के साठा झाला आहे. हे धरण कोणत्याही क्षणी १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. बोरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. बोरी, गिरणा प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने प्रकल्पातून पुराचे अतिरिक्त पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात येईल. गिरणा, बोरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
– विनोद पाटील, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव















Discussion about this post