जळगाव । राज्यात लवकरच निवडणूक लागणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र त्यापूर्वीच जळगाव महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ती म्हणेज ठाकरे गटाचे १३ नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा प्रवेश सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांत रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार योग्य ठरेल याचा आढावा घेण्यासाठी पक्षीय बैठका सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर काही नगरसेवक किंवा त्यांचे पती पक्षांतराच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे जळगाव महानगरपालिकेचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील निवडणुकीत काही नगरसेवकांनी शिवसेना उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आता तेच नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. यामुळे आगामी निवडणुकांच्या गोळाबेरीजमध्ये मोठा बदल होऊ शकतो.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या फॉर्महाऊसवर नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक तसेच भाजप व शिंदे गटाशी संबंधित काही नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे या घडामोडींच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत.
Discussion about this post