मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाचा तिढा सुटता सुटत नाहीय. आज होईल उद्या होईल म्हणत वर्ष उलटून गेलं. त्यात अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने हा तिढा आणखीच वाढला आहे. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा घोळ अखेर सुटला आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तासभर चर्चा केली. या बैठकीत दोन्ही प्रश्न निकाली लावण्यात आले आहेत. या बैठकीत मंत्रिपदाचा 4-4-2 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार जागा वाटप होणार आहे.
दरम्यान, दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याने आज किंवा उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली.
गेल्या अनेक दिवसापासून मंत्रिमंडळ विस्तार आणि खाती वाटपाची चर्चा सुरू होती. पण त्यातून काहीच मार्ग निघत नव्हता. एक तर शिंदे गटाचा अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध होता. तसेच सहकार आणि ग्रामविकास खात्यावरूनही माथापच्ची सुरू होती. हा तिढा सुटता सुटत नव्हता. त्यामुळे अखेर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काल संध्याकाळी दिल्ली गाठली.
काय आहे 4-4-2 फॉर्म्युला?
4-4-2 फार्म्युल्यानुसार भाजपला चार मंत्रिपद मिळणार आहेत. त्यानंतर शिंदे गटालाही चार मंत्रिपद मिळणार असून राष्ट्रवादीला दोन मंत्रिपद मिळणार आहेत. म्हणजे एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नव्या फॉर्म्युलानुसार भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी चार मंत्रिपद मिळणार आहेत. या दोन्ही गटाचे आधीच मंत्रिमंडळात प्रत्येकी 10 मंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांची संख्या प्रत्येकी 14 होणार आहे. राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळात 9 मंत्री आहेत. त्यांना आणखी दोन मंत्रीपदे मिळणार असल्याने त्यांच्या मंत्र्यांची संख्या 11 होणार आहे.
Discussion about this post