मुंबई । राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असताना भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन संकटात सापडले आहेत. जळगावातील कथित बीएचआर घोटाळ्याप्रकरणात चौकशीत त्रुटी ठेवल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मात्र यातच भाग्यश्री नवटके यांनी आता याप्रकरणात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्यासोबतच राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचेही नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे.
घोटाळ्याच्या आरोपपत्रासह दाखल असलेल्या अंतरिम न्यायवैद्याक लेखा परीक्षण अहवालात महाजन हे लाभार्थी असल्याचे उघड झाले होते, असा दावा नवटके यांनी फौजदारी रिट याचिकेत केला आहे. तसेच अन्य एका घोटाळ्याच्या तपासात राज्याच्या पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांच्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केल्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे नवटके यांनी याचिकेत म्हटले आहे.
आता पोलीस अधिकरी भाग्यश्री नवटके यांनी केलेल्या या आरोपांमुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांकडून हा मुद्दा तापवला जाण्याची शक्यता आहे. राज्याचे ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांनी हे आरोप फेटाळले असून राजकीय षडयंत्रातून हे सर्व सुरू असल्याचे म्हटले आहे. ‘ही पतसंस्था बहुराज्यीय असल्यामुळे आवश्यक असलेली केंद्र सरकारच्या निबंधक कार्यालयाची परवानगी तसेच आर्थिक गुन्ह्यासाठी पोलीस महासंचालकांचीही मान्यता घेण्यात आलेली नव्हती. आपल्याला अडकविण्याचे हे राजकीय षडयंत्र असल्याचं गिरीश महाजन म्हणाले















Discussion about this post