चाळीसगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू असून यामुळे जिल्ह्यातील मोठ्या आणि लहान-मध्यम धरणाची पाणीपातळी वाढत आहे. यातच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मन्याड धरणावरील माणिकपुंज प्रकल्पातून सुमारे २८,००० ते ३०,००० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे मन्याड नदीला पूर आला असून नदीकाठावरील नागरिक, पशुधन, चीजवस्तू, शेती मोटार पंप, गुरेढोरे इत्यादींच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे,
मन्याड मध्यम प्रकल्प हे चाळीसगाव तालुक्यात मन्याड नदीवर नांद्रे गावाजवळ बांधलेले माती भरलेले धरण असून, त्याची उंची ४५ मीटर आणि लांबी १,६७७ मीटर आहे. हे धरण प्रामुख्याने सिंचन उद्देशाने बांधले गेले असून, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल तालुक्यांतील अनेक गावांना पाणीपुरवठा आणि शेतीसाठी महत्त्वाचे आहे.
या धरणाचे पाणी पुढे सायगाव येथे गिरणा नदीला मिळते, ज्यामुळे गिरणा नदीतही पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षांपूर्वीही सलग ओव्हरफ्लो होण्याच्या घटनांमुळे नदीकाठच्या भागात सावधगिरी बाळगण्यात आली होती.
पाटबंधारे विभागाने नदीकाठावरील गावांना सूचना जारी केल्या असून, स्थानिक प्रशासनासह समन्वय साधून पूर नियंत्रणाची तयारी केली आहे. नागरिकांनी धरण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे आणि अनावश्यक धोका टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post