लखनऊ: देशभरात महिलांसह मुलींचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशातच अंगावर थरकाप उडवणारी एक घटना समोर आली असून प्रेम प्रकरणातून एका भावानं धारदार शस्त्रानं त्याच्या बहिणीचा गळा कापून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपी बहिणीचं शिर हातात धरुन गावभर फिरत होता.यावेळी अनेकांचा अक्षरश: थरकाप उडाला.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील आहे.. आशिफा नावाच्या तरुणीचे गावात राहणाऱ्या चांद बाबूशी प्रेमसंबंध होते. २९ मे रोजी ती प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर पोलिसांनी चांद बाबू विरोधात गु्न्हा दाखल केला आणि त्याची रवानगी तुरुंगात केली. शुक्रवारी याच मुद्द्यावरुन भाऊ-बहिणीचा वाद झाला. भांडण वाढत गेलं. संतापलेल्या रियाजनं बहीण आशिफाचा गळा कापून निर्घृण हत्या केली.
आशिफाची हत्या केल्यानंतर रियाज तिचं शिर हातात घेऊन घरातून बाहेर पडला. हातात मुंडकं घेऊन रस्त्यावरुन चालणाऱ्या रियाजला पाहून अनेकांचा थरकाप उडाला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं पोहोचून त्याला अटक केली. ‘एका भावानं बहिणीची हत्या केली आहे. त्याला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे,’ असं अपर पोलीस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी सांगितलं.
Discussion about this post