मुंबई । गेल्या महिनाभरापासून देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा गारठा, तर कुठे ढगाळ वातावरण आहे. गेल्या काही दिवसापूर्वी चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला होता. सध्या आता तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. पावसामुळे थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, पुढील २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडीने दक्षिणी तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपला अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे.
याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर कमी होईल. उत्तर तामिळनाडू, उत्तर केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे मागील दोन दिवसांत राजधानी दिल्लीतील तापमानाचा पारा घसरला आहे.सोमवारी दिल्लीत किमान तापमान ७.१ नोंदवलं गेलं आहे. एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह संपूर्ण उत्तर भारतातील भागात तापमानात घट दिसून आली आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी जाणवत आहे. पुढील चार दिवस दिल्लीतील ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पुढील 48 तासांत (मंगळवार व बुधवार) राज्यात आकाश वेळोवेळी अंशत: ढगाळ राहील. यासोबतच गुरुवारपर्यंत म्हणजेच पुढील 72 तासांत पहाटे किंवा सकाळी तुरळक ठिकाणी धुके पडेल. दिवसा सुद्धा ढगाळ वातावरण राहणार असल्याने कमाल तापमानात किंचित घट होईल.















Discussion about this post