जळगाव । भाजपला सोडचिट्टी देऊन शिवसेना ठाकरे गटात आलेल्या माजी खासदार उन्मेष पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची कविता ऐकवत भाजपला खडेबोल सुनावलं आहे.
छोटे मनसे कोई बडा नही होता, तुटे मनसे कोई खडा नही होता… हे अटलजींचे वाक्य होतं. भाजपमध्ये आता छोटं मन राहिलं आहे. छोट्या मनाने जे राजकारण करतात ते अत्यल्प काळासाठी असतं. दीर्घकाळ राजकारण करण्यासाठी मोठे मन लागतं, असा हल्लाच उन्मेष पाटील यांनी लगावला आहे.
जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील प्रचाराच्या मैदानात उतरले असून यावेळी त्यांनी आपल्या खणखणीत भाषणातून भाजवर जोरदार निशाणा साधला आहे.राजकारणात सध्या इंग्रजांची नीती अवलंबली जात आहे. राजकारणात नेहमी माणसं तोडली जातात. मन तोडली जातात. पण एका सकारात्मक राजकारणाची चाहूल आपण चाळीसगावमध्ये बघत आहोत.
उद्धव ठाकरे यांच्यासारखा निर्मळ, निष्कलंक मुख्यमंत्री होणे नाही हे महाराष्ट्रातील 39 टक्के लोकांचं म्हणणं आहे. म्हणून मी ठरवलं कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा. राजकारणात मनाने मोठे असले पाहिजे. म्हणून मशाल हातात घेऊन मी आणि करण पवारांनी ही भूमिका घेतली आहे, असं उन्मेष पाटील म्हणाले.
टायगर अभी जिंदा है, फिर वही दिल लाया हूँ… अशी शेरोशायरीही त्यांनी केली. आपल्याला गरुड झेप घ्यायची आहे. आमदार म्हणजे आम लोकांसाठी दारात जाऊन सेवा करणारं पद आहे. दुर्दैवाने आपले आमदार जमिनीवर नसून लोकांच्या जमिनी घेत सुटले आहेत. लोकप्रतिनिधी हा संवेदनशील असला पाहिजे, लोकांच्या सुखदुःखात कामा येणार असला पाहिजे. अटलजींची भाजप म्हणतात परंतु त्यांचं वाक्य विसरून गेले आहेत. छोटे मनसे कोई बडा नही होता, तुटे मनसे कोई खडा नही होता… हे अटलजींचं वाक्य होतं. भाजपला आज त्याचाच विसर पडला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.















Discussion about this post