जळगाव । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाचे उपाध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. सोबतच त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील आणि काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निलंबित केल्यानंतर उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका स्पष्ट केली. “काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही दिसत आहे. याचमुळे काँग्रेस रसातळाला जात आहे”, असं उल्हास पाटील म्हणाले. कुठलीही विचारणा किंवा नोटीस न देता कारवाई केल्याबद्दल उल्हास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “मला दुपारी दोन वाजेच्या सुमारास निलंबित केल्याचं पत्र मिळालं. मात्र कुठलाही विचार न करता थेट कारवाई केल्यामुळे आता त्यांना विचारायचं काय?”, असा प्रश्न उल्हास पाटील यांनी उपस्थित केला.
यावेळी उल्हास पाटील यांना भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “कारवाई झाल्यामुळे आता दुसरा काहीतरी विचार करावा लागेल”, असं म्हणत पत्नी वर्षा पाटील यांनासोबत घेऊन कन्या केतकी पाटील सोबत बुधवारी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे संकेत दिले. दरम्यान, उल्हास पाटील यांची एका माध्यम प्रतिनिधीशी बोलतानाची ऑडिओ क्लिप Tv9 च्या हाती लागली आहे. त्यात बुधवारी मुंबईत भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे उल्हास पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
Discussion about this post