जळगाव । भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात जळगावच्या जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) या तरुणाचा खून झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी ११ वाजेच्या दरम्यान घडली आहे. घटनेच्या अवघ्या काही तासात संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र कोळी (वय ४०) हा जळगाव शहरातील तीन परिचित व्यक्तींसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका वैयक्तिक कामानिमित्त गेला होता. रात्री उशिरा चौघेही एका हॉटेलवर बसून मद्यपान करत असताना त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद काही क्षणांतच चकमकीत परिवर्तित झाला आणि तिघा आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. पोलिसांच्या पथकाने रात्रभर प्रयत्न करून गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
या संशयित आरोपी राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (वय ३८, रा. कांती चौक, शिवाजी नगर, जळगाव) मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२, रा. बारसे नगर, शिवाजी नगर, जळगाव) या दोन्ही संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
दरम्यान, भुसावळ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी स्वतंत्र पथक तयार करून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या पथकाने तपासाच्या दिशेने निर्णायक हालचाल करत दीपक वसंत शंखपाळ (रा. कंडारी, ता. भुसावळ) या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं. या कारवाईत भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमागील नेमकं कारण आणि इतर कोणतेही सहकारी असल्यास त्यांचा शोध सुरू आहे.















Discussion about this post