चाळीसगाव : तालुक्यातील दस्केबर्डी गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना रस्ते अपघाताचा बनाव करून जीवे मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी रात्री दस्केबर्डीचे सरपंच भगवान उत्तम देवरे आणि उपसरपंच ईश्वर उर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे हे बुलेट मोटारसायकलवरून चाळीसगावहून गावाकडे परताना त्यांच्या मोटारसायकलला शिंदवाडी शिवारात समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही खाली पडले असून सरपंच देवरे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर सुरुवातीला हा अपघात असल्याचे समजले होते. मात्र उपसरपंच ईश्वर अहिरे यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली.
मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान पिकअप वाहनाचा शोध घेऊन वाहन मालकास ताब्यात घेतले असता, दस्केबर्डी गावातील राजकीय मतभेदातून हा कट रचल्याचे समोर आले.
या प्रकरणात भीमराव पांडुरंग रोकडे, सचिन भीमराव रोकडे, गोविंदा विठोबा माळी आणि लक्ष्मण अशोक महाजन (रा. वाडे, ता. भडगाव – पिकअप मालक) या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी संगनमत करून सरपंच व उपसरपंचांना ठार मारण्याच्या उद्देशानेच मोटारसायकलला पिकअपने धडक दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अपघाताचे कलम कमी करून खुनाचा प्रयत्न व कट रचल्याची गंभीर कलमे लागू केली आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय लाटे करत आहेत.















Discussion about this post