मुंबई: सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या मुद्द्यावरुन विरोधकांकडून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. याच प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
दीपक केसरकर यांना बुटाने मारले पाहिजे. केसरकर हे अफजलनाखानाची औलाद आहेत. असली सडक्या विचाराची माणसं आमच्यातून निघून गेली, हे बरंच झालं, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेविषयी संताप व्यक्त केला. यावरुन त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. शिवाजी महाराजांचा पुतळा अशाप्रकारे कोसळणं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. फक्त निषेध करून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची फाईल बंद करता येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी म्हटले आहे की, हा पुतळा पडला असेल तर तो फक्त भ्रष्टाचारामुळे. पाण्यावर आणि शिखरावर अनेक पुतळे उभारण्यात आले आहेत. प्रतापगडावर ताशी 120 किमी वेगाने वारे वाहत आहेत, तो पुतळा उभा आहे ना. पण मालवण किल्ल्यावरील उभारलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या सात महिन्यांत पडतो. वाऱ्याने पुतळा पडला म्हणता मग आजूबाजूची झाड पडली नाही, लोकांच्या घरांवरील पत्रे उडाले नाहीत. तो पुतळा का पडला तर भ्रष्टाचारने पोखरलेला हा पुतळा उभारण्यात आला, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला आहे, असे राऊत यांनी म्हटले.















Discussion about this post