पुणे । पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर न्यायालयीन कोठडीत असून अशातच खेवलकर यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी आहे. ती म्हणजे खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. ज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून राज्य महिला आयोगाकडे ही तक्रार करण्यात आली आहे.
त्यात म्हटले आहे की, ज्या रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला, त्यातील आरोपी डॉ. प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वतःच्या नावाने हॉटेल रूम बुक करून अनेक वेळा परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावले होते. हे एक रॅकेट असल्याचे दिसत आहे असं तक्रारीत म्हटलं आहे.
त्यानंतर महिला आयोगाने पोलिस आयुक्त, पुणे यांना या प्रकरणाची मानवी तस्करीविरोधी पथक आणि सायबर विभागामार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच पुणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रावरून रोहिणी खडसे यांनी निशाणा साधत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुद्दा क्र. 1 ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.
मुद्दा क्र. 2 राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?
मुद्दा क्र. 3 राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले ? इतके कसे कार्यतत्पर झाले ?
आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे…
Discussion about this post