जळगाव : भुसावळकडून जळगावच्या दिशेने प्रवाशी घेऊन निघालेल्या रिक्षाला भीषण अपघात झाला. महामार्गावर धावत्या रिक्षाच्या पुढील चाकाचा एक्सेल तुटल्याने हा अपघात झाला. यात रिक्षा पलटी होऊन एकाच मृत्यू झाला. तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद गावाजवळ घडली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भुसावळ शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणार वसीम खान ईस्माईल खान (वय २८) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. वसीम हा जळगाव येथील एमआयडीसीत एका कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान नेहमीप्रमाणे वसीम जेवणाचा डबा घेऊन भुसावळ येथून जळगावला कामावर येण्यासाठी घरून निघाला होता. यासाठी एका रिक्षात बसला होता. त्याच्यासोबत रिक्षामध्ये आणखी दोनजण होते.
चाकाचा एक्सल तुटल्याने रिक्षा उलटली
भुसावळकडून जळगावच्या दिशेने प्रवासी घेऊन येणारी रिक्षा नशिराबादकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावरून जाताना अचानक रिक्षाच्या पुढील चाकाचे एक्सेल तुटले. यामुळे चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्यावरच उलटली. यात वसीम खान हा रस्त्यावर फेकला गेल्याने त्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला. नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान वसीम खान हा गंभीर जखमी असल्याने याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. वसीम मृत झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तर इतर २ जखमींना नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. सदर अपघात प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post