जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा संतापाचा स्फोट पाहायला मिळाला. वीज वितरण कंपनीच्या कारभारावर अधिकाऱ्यांना मंत्री खडसे यांनी धारेवर धरले. प्रोटोकॉलवरूनही अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.
बैठकीदरम्यान शहरातील वीज वितरण कंपनीच्या खांबांच्या स्थलांतराचा विषय चर्चेत आला. अधिकाऱ्यांनी कामाची माहिती देण्यास सुरुवात केली असताना मंत्री खडसे यांनी हस्तक्षेप करत अनेक प्रश्न उपस्थित केले. कामाच्या अंमलबजावणीतील विलंब, समन्वयाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींना न दिली जाणारी माहिती यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी मंत्री खडसे आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. “या योजनेसाठी ६० टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. योजना प्रभावीपणे राबविली जावी यासाठी खासदार सातत्याने पाठपुरावा करतात. मात्र प्रशासन खासदारांची उपेक्षा का करते?
उद्घाटनावेळी आमदारांना प्राधान्य दिले जाते, पण केंद्राचा निधी असूनही खासदारांना डावलले जाते,असाही आरोप त्यांनी यावेळी केला. कामांच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार व आमदार दोघांनाही प्रोटोकॉलनुसार निमंत्रित करणे आवश्यक असल्याचे सांगत कामांचे प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अहवाल तयार करावा, जेणेकरून समन्वयातून कामे वेळेत पुर्ण होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे अशा प्रकारची दुर्लक्षाची घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची थेट लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याची तंबीही त्यांनी दिली.















Discussion about this post