मुंबई – मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला घर नाकरण्यात आल्याच्या घटनेवरून राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय वर्तुळात देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील याप्रकरणी आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीटद्वारे (एक्स) आपली भावना व्यक्त केली आहे.
‘मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहीत नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित,’ असा आक्रमक इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
मुलुंडप्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत राज ठाकरे यांनी त्यांना एक आवाहनही केलं आहे. ‘काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरू राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे,’ असं राज म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असे म्हणत सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील मुलुंड पश्चिममध्ये तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसह ऑफिस भाड्याने घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये त्या ऑफिस पाहण्यासाठी गेल्या असता त्या मराठी असल्याने त्यांना ऑफिस मिळणार नाही, असे सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितले. याबाबत तृप्ती यांना जाब विचारला असता त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा करण्यात आली. या घटनेनंतर या महिलेने फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
Discussion about this post