मुंबई : जोरादर पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पाहुयात आज कोणत्या विभागात कोणता अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट :
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
त्याचबरोबर सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Discussion about this post