मुंबई/जळगाव । मध्य-पूर्वेतील इराण-इस्राइल युद्धाचा वणवा आता थेट महाराष्ट्रातील नागरिकांच्या स्वयंपाकघरात पोहोचला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांत खाद्यतेलाच्या दरात तब्बल १००–१२५ रुपयांची वाढ झाली आहे. १५ लिटरच्या डब्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात खाद्यतेल अधिक महागण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक बाजारपेठेतील आकडेवारीनुसार, शेंगदाणा तेलाचा १५ लिटरचा डबा पूर्वी २,५०० रुपयांना मिळत होता, तो आता २,६५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोयाबीन तेलाचे दरही २,२०० ते २,२८० रुपयांवरून २,३०० ते २,३८० रुपयांच्या घरात गेले आहे. तर सनफ्लॉवर तेलाच्या दरात मोठी वाढ होऊन ते २,४७० रुपयांवर स्थिरावले आहे.
सध्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडे जुना साठा उपलब्ध असल्याने भावातील ही वाढ काही प्रमाणात मर्यादित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आखाती देशांमधील स्थिती अशीच तणावपूर्ण राहिल्यास आणि नवीन साठा वाढलेल्या दराने उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा मोठा परिणाम होणार आहे. सरकारने साठेबाजांविरुद्ध कडक पावले उचलली असून मार्गदर्शक सूचना जारी करून सणासुदीच्या काळात भाव स्थिर राहण्याचे प्रयत्न सुरू आहेत.















Discussion about this post