मुंबई । मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासा बसणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्या मान्य झाल्या नाही, तर आपण राज्यातील सरकारसुध्दा उलथून टाकू शकतो, असा इशारा जरांगे-पाटील यांनी सोमवारी दिला. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना सवाल केला आहे. “मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. इतकेच नाही तर अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील अनेक प्रस्थापित मराठा सत्तेत होते. ज्यामध्ये शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता,” असेही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केले आहे.
मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत.
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतांना सत्तेत सर्व…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 25, 2025
“तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का?” असा सवालही आंबेडकरांनी या पोस्टच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना केला आहे















Discussion about this post