अकोला । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी आता अवघे चार दिवस उरले आहेत. २० नोव्हेंबर मतदान होईल तर २३ ला निकाल लागेल. राज्यात कोणाचे सरकार येणार हे पुढील आठवड्यात स्पष्टच होईल. मात्र विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘
‘विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार.’, असल्याचे मोठं वक्तव्य त्यांनी केले आहे. अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं वक्तव्य केले. ‘राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं.’, या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
‘बटेंगे तो कटेंगे’च्या मुद्द्यावरूनही प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर प्रहार केला आहे. ‘विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्न करतंय.’, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. माध्यमं जाणीवपूर्वक वंचितकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या सत्तेसोबत जाण्याच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.















Discussion about this post