जळगाव | राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशात निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काल रात्री बुलढाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा परिसरातील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे आणि शरद पवार गटाची साथ सोडली आहे. शरद पवार गट आणि ठाकरे गटातील तब्बल 400 कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
पक्षप्रवेशावेळी मंत्री गुलाबराव पाटील, बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार चिमणराव पाटील देखील उपस्थित होते. जवळपास 60 ते 70 वाहनातून कार्यकर्ते बुलढाण्यात दाखल झाले होते. बुलढाणामधील रेसिडेन्सी क्लब येथे सदर पक्षप्रवेश पार पडला. यामुळे जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला आणि शदर पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,निवडणुकीच्या कामात कितीही व्यस्त असलो तरी आम्ही दररोज सर्व माहिती घेतो. प्रलंबित कामांसाठी मुख्य सचिव , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेत त्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना देत असतो. आपलं सरकार सामान्य जनतेचं आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिलं आहे.















Discussion about this post