जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील 22 शेतकऱ्यांची पैनगंगा साखर कारखान्याकडे सुमारे 60 लाख रुपयांची उसाची थकीत देणी आहेत. या रकमेचे अद्यापही पेमेंट झाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, येत्या काळात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
8 जानेवारी 2025 पासून पैनगंगा साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नशिराबाद, बेळी आणि निमगाव शिवारातील शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला होता. कंपनीने 20 दिवसांत पेमेंट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत कोणतेही पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. कारखाना प्रशासनाकडून उडवाउडवीची भूमिका घेतली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या कंपनीचे चेअरमन व कृषी अधिकारी शेतकऱ्यांचे फोन देखील उचलत नसल्याची तक्रार आहे.
शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तत्काळ थकीत पेमेंट झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल आणि त्यास संपूर्ण जबाबदार कारखाना प्रशासन असेल.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना याप्रसंगी राकेश विष्णू पाटील, प्रभाकर नामदेव नारखेडे, रामदास त्र्यंबक पाटील, माधुरी राकेश पाटील, प्रमोद दनू पाटील, शरद तुळशीराम चौधरी, प्रकाश नामदेव नारखेडे, हरी गोविंदा पाचपांडे, लिलाधर भानू नारखेडे, चंद्रकांत दगडू नारखेडे, स्वानील चंद्रकांत पाटील, ज्ञानदेव धांडे, नरेंद्र भंगाळे, प्रदीप नारखेडे, नामदेव महाजन, शरद राणे, प्रवीण राणे, सुभाष भोई आणि आदी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Discussion about this post