नंदुरबार : महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॉलाचा विद्युत तारांना स्पर्श झाल्यामुळे संपूर्ण ट्रकमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने चालकाचा यात होरपळून मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्र आणि गुजरात राज्यावरती सीमेवर असलेला नंदुरबार जिल्ह्यातील आश्रवा गावाजवळ घडली.
अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या आश्रवा गावाजवळील मंदिरा समोरून ट्राला जात असताना मागचा भाग विद्युत तारेला लागला. यामुळे तात्काळ आग लागली आणि ट्रालाची केबिन जळू लागली. यावेळी चालक केबिनमध्ये अडकला होता. त्याला बाहेर निघता न आल्याने त्याचा ट्रकच्या कॅबिनमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि वीज वितरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वीज पुरवठा बंद करून आग विझवण्याचा प्रयत्न झाला. पण तोपर्यंत चालकाचा मृत्यू झाला होता. मृत चालक हा पंजाब राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून घटना घडली यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक देखील काहीच करू शकले नाही. दरम्यान मंदिराजवळ असलेल्या विद्युत तारांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
Discussion about this post