देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी काल मतदान झालं. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाला.दिवस जसजसा वर चढत गेला मुंबईत भाजप-शिंदे गटाची सरशी होताना दिसू लागली. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने १०० जागांचा टप्पा पार केला आहे. या जबरदस्त कामगिरीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या ‘युतीला’ला मोठा धक्का बसल्याचे प्राथमिक कलांमधून दिसून येत आहे.
मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. यावेळी मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप झाले, अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र, आता हाती येत असलेल्या कलांनुसार, मुंबईकरांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे प्राथमिकरीत्या दिसून येत आहे. शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, मुंबई महानगरपालिकेवर भाजपचं कमळ फुलणार का?, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
तर दुसरीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला भाजपने दिलेल्या या धक्क्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुंबईतील अनेक पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पिछाडीवर टाकले आहे.
मात्र असे असले तरी हे केवळ सुरुवातीचे कल आहेत. अनेक प्रभागांमध्ये अद्याप मतमोजणीच्या फेऱ्या बाकी असून, अंतिम निकाल हाती येण्यास काही तासांचा अवधी उरला आहे. थोड्याच वेळात सर्व जागांचे चित्र स्पष्ट होईल आणि मुंबईचा नवा ‘महापौर’ कोणत्या पक्षाचा असेल, हे निश्चित होईल. मात्र, सध्याच्या घडीला भाजपने घेतलेली आघाडी पाहता, मुंबईच्या राजकारणात मोठे सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post