जळगाव । मुक्ताईनगर येथील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची काही युवकांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली असून प्रकरणात पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यामध्ये एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले
अनिकेत भोई, किरण माळी, आणि अनुज पाटील तर एक आरोपी हा अल्पवयीन आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून मुख्य आरोपी अनिकेत भोई हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तो एका राजकीय पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखाचा पुतण्या आहे. त्याच्या विरोधात या आधीही चार गंभीर गुन्हे दाखल आहे. पोलीस आधीक्षकांना आरोपींची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? असा प्रश्न विचारला असता पोलिसांनी नो कमेंट बोलून त्यावर बोलणे टाळले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत झालेल्या छेडछाडीबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुर्दैवाने छेडछाड करणाऱ्यांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत. ज्यांनी अतिशय वाईट अशाप्रकारचं काम केलेलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. यापैकी काही आरोपींना अटक केलेली आहे.तर इतरांनाही अटक केली जाईल पण अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणं मुलींना त्रास देणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत माफ केलं जाऊ नये. त्यांच्याविरोधात अत्यंत कठोर कारवाई होईल.
या सर्व घटनेवर शरद पवार गटाचे नेते तथा रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी देखील याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘ज्यांनी छेडछाड केली ते निव्वळ टवाळखोर नाही तर गुंड आहेत. मुलींसोबत असलेल्या पोलिसांनी त्या गुंडाना अडवण्याचा प्रयत्न केला पण या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली. राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांनंतर मुली पोलीस ठाण्यात जायला घाबरतात. तू स्वतः पोलीस ठाण्यात जा आणि तक्रार दाखल कर, असं मी नातीला सांगितलं. कुणालाही घाबरायचं कशाला?















Discussion about this post