जळगाव । राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असून निवडणुकांच्या जाहीरनाम्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वानस सरकारने दिलं होतं. मात्र, अद्यापही महिलांना 1500 रुपयेच दिले जातात. तर, 2100 रुपये कधी द्यायचे ते आर्थिक बजेट पाहून निर्णय घेऊ असे अर्थमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी म्हटलं होतं. तर, आता राज्याचे कॅबिनेटमंत्री नरहरी झिरवळ यांनी 2100 रुपये देण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. ‘लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही’, असे म्हणत झिरवळ यांनी चक्क 2100 रुपये देण्यावरुन घुमजाव केला आहे.
लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार, याची प्रतिक्षा सध्या लाडक्या बहिणींना आहे. तसेच, 1500 रुपयांचे 2100 कधी होणार याची देखील उत्सुकता आहे. मात्र, लाडक्या बहिणींच्या हप्त्यावरुन सत्ताधाऱ्यांची टोलवाटोलवी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही’, असे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलंय. विरोधकांनीच 2100 रुपयांवर जोर लावलाय. लाडक्या बहिणींना 1500 रुपयेही पुरेसे आहेत, त्या खूश आहेत, असे म्हणत झिरवळ यांनी 2100 रुपये देण्यावरुन पलटी मारल्याचं दिसून येत आहे.
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये या योजनेचा वाटा महत्त्वाचा ठरला. कारण, महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होत. मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन देखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये पुन्हा वाढ न करण्यात आल्यानं विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्यावर जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो, असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. मात्र, आता तर 1500 रुपयांत लाडक्या बहिणी खुश आहेत, 2100 देऊ असं म्हटलंच नसल्याचे राज्य सरकारमधील मंत्री झिरवळ यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post