गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. अखेर या मागणीला यश आले आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयानंतर राज्यभरातून त्याचे स्वागत करण्यात आले. मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत, पाली या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
अभिजात भाषा मिळवण्यासाठी काय निकष असतात?
कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी त्याचे काही निकष ठरवण्यात आले आहेत. ते निकष खालीलप्रमाणे असतात.
– संबंधित भाषा प्राचीन असावी आणि त्यातील साहित्य श्रेष्ठ असावे
– भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे लागते
– त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी
– प्राचीन भाषा आणि तिचे अधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
– ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे, अनुवादित नसावे. (Marathi Language)
अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय?
आतापर्यंत देशात 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वप्रथम म्हणजेच 2004 साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया (2014) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते. आता 2024 मध्ये मराठी भाषेला देखील हा दर्जा मिळाला आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदे मिळणार?
– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार.
– यामुळे आता भारतातील सर्व 450 विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते.
– मराठीतील प्राचीन ग्रंथांचे अनुवादन केले जाईल.
– राज्यातील 12 हजार ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्यानंतर या सर्व ग्रंथालयांचे सशक्त करण होईल.
– अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल.
– मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळेल.
– मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी त्याच्या संवर्धानासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळू शकेल.















Discussion about this post