जालना : मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. सलग ९ दिवसांपासून अन्न पाण्याचा त्याग केल्याने जरांगे पाटील यांच्या रक्ताची पातळी कमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, डॉक्टरांचं एक पथक उपोषणस्थळी दाखल झालं असून जरांगे पाटील यांच्यावर उपचार केले जात आहे.
कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचं नाही असा निर्धारच त्यांनी केला आहे. तर त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा कार्यकर्त्यांना टेन्शन आलं आहे.मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे.
आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस असून ते आपल्या मागण्यावर ठाम आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, मेलो तरी चालेल, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
दरम्यान, जरांगे यांनी राज्य सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. दुसरीकडे जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते.
Discussion about this post