मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नेमके प्रकरण काय? काही महिन्यांपूर्वी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते. २ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या आंदोलनासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती, असा पोलिसांचा आरोप आहे. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.
या प्रकरणात जरांगे पाटील यांच्यासोबत पांडुरंग तारक, गंगाधर कालकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांसारख्या अन्य सहकाऱ्यांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत.
धनंजय मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच समन्स विशेष म्हणजे, सध्या मनोज जरांगे पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहेत. मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे, तर मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अशा वादळी परिस्थितीत जरांगे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे या चौकशीसाठी मुंबईत उपस्थित राहतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post