मुंबई | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता आगामी काळात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी पक्षात मोठे बदल केले जाणार आहेत. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख आणि विभागीय संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजी-माजी आमदार, खासदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवत पक्षाची निवडणूक यंत्रणा अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महत्त्वाच्या मुंबई आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्या सोबत मंत्री योगेश कदम , माजी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार निलेश राणे हेही समन्वयाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांच्याकडे पुणे, मावळ आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर खासदार नरेश मस्के यांना भिवंडी आणि कल्याण मतदारसंघांचे संपर्कप्रमुख करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्याकडे शिर्डी मतदारसंघातील संघटन मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय, विभागीय स्तरावरही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दक्षिण कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उत्तर कोकण विभागातील रायगड आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या संघटनात्मक फेरबदलांमुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.















Discussion about this post