मुंबई । नुकतीच राज्यातील ४८ लोकसभा जागांवर निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर महाविकास आघाडीने तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात हेच चित्र असेल, असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. आता अशातच राज्यातील महायुती सरकारचा रडखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधीमंडळाचे पावसाची अधिवेशन २७ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त पदे भरली जातील. त्याचबरोबर महामंडळाचे देखील वाटप करण्यात येईल. निवडणुकीआधी आमदारांना बळ देण्याचा हा महायुतीचा प्रयत्न असेल, असंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे कोणत्या आमदारांना किती मंत्रिपदं मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
शिंदे गटाला किती मंत्रिपदं मिळणार?
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला नेमके किती मंत्रिपदं मिळणार, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे. संदिपान भुमरे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची जागा देखील रिक्त झाली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी ३ मंत्रिपदे मिळू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं आहे.















Discussion about this post