राज्यभरात तापमानाचा पारा वाढत असताना दिसत असून अशातच मुंबईसह कोकणातील शहरे प्रचंड उष्णतेच्या कचाट्यात सापडली असून, गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील अनेक शहरांचे तापमान ३८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून, प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत.विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील २४ तासांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा परिसरात तापमान स्थिर असले तरी, उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. आज मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ही तीव्र उष्णतेची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील उर्वरित भागांत कोरडे आणि अत्यंत गरम हवामान पाहायला मिळत आहे.
बुधवार (२६ फेब्रुवारी) रोजी राज्यातील पुणे आणि कोल्हापूर विभागात कोरडे हवामान होते. पुण्यात शिवाजीनगर येथे ३६.२°C तर लोणावळ्यात ३७.६°C तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल तापमान २७.६°C होते. कोल्हापूर आणि सांगलीत तापमान ३२°C ते ३५°C दरम्यान राहिले. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत तीव्र उष्णता जाणवत होती. नंदुरबारच्या शाहादा येथे सर्वाधिक ३९.९°C तापमान नोंदले गेले, तर धुळे, जळगाव आणि नाशिकमध्ये ३३°C ते ३६°C तापमान राहिले.
Discussion about this post