इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान यंदा केंद्रांवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मास कॉपीचे प्रकार उघडकीस येत आहेत. या घटनांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्याने राज्यभरात आतापर्यंत 81 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेदरम्यान बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र क्रमांक 224 येथे कॉपीचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात प्रशासनाने 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले आहे. विशेष म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी, 10 फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघड झाला.
तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे केंद्र क्रमांक 0079 वर सामूहिक कॉपी होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. यात पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांच्यासह काही जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 21 जणांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील काही केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यांकडून कॉपी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असून पर्यवेक्षक म्हणून नियुक्त पाच शिक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एका केंद्रावर राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये मायक्रोनोट तसेच चॅट जीपीटीचे प्रिंटआउट वापरून सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तीन शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर अधिक कडक करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.














Discussion about this post