पुणे । गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र अंदाज तंतोतंत खरा ठरला नसला, तरी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यात आजपासून जळगाव जिल्ह्याला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज २१ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार, असं होसळीकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
आजपासून पुढील चार ते पाच दिवस मुंबई, कोकण, पुणे, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्ये तसेच मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल. विदर्भ- बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.















Discussion about this post