मुंबई/जळगाव । उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून याचा परिणाम राज्यावर देखील दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आले आहे. यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. अजून दोन दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये गार वारे वाहत आहे. पुणे आणि नाशिकचे तापमान 8.6 अंश सेल्सिअसवर खाली आले आहे. यामुळे सकाळीही स्वेटर घालावे लागत आहे. नाशिकपेक्षा थंड नाशिकमधील निफाड झाले आहे. सलग चौथ्या दिवशी देखील निफाडच्या तापमानात घसरण झाली आहे. निफाडचा पारा 4.5 अंश सेल्सिअसवर आला आहे. निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रामध्ये ही नोंद करण्यात आली.
मुंबईत गार वारे
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा जाणवत आहे. शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक थंडी आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रात १७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईचे कमाल तापमान अनुक्रमे ३०.८ अंश सेल्सिअस आणि ३२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दरम्यान, यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीच्चांकी तापमान मंगळवारी नोंदवले गेले. शुक्रवारपर्यंत किमान तापमान १६ ते २० अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे
हवामान विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारपासून पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस थंडी कायम राहील. पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या शहराचे तापमान दहा अंशाच्या खाली होते.
Discussion about this post