लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोलचे निकाल जाहीर होत आहेत. मोदी सरकार पुन्हा येण्याची शक्यता बहुतांश एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तीन सर्वेक्षणांमध्ये एनडीएला 400 हून अधिक जागा मिळेल, असं सांगण्यात आलं आहे. तर स्कूल ऑफ पॉलिटिक्सने AI तंत्रज्ञानावर आधारित एक्झिट पोल आणि मत सर्वेक्षण केले आहेत. त्यांच्या मते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 367 ते 403 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणात एनडीए आघाडीला 49.30 टक्के मते मिळू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.
स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्ष इंडिया आघाडीला 129 ते 161 जागा आणि इतरांना 7 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, या एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडीला 38.40 टक्के मते मिळू शकतात आणि इतरांना 12.30 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे.
एसओपी व्यतिरिक्त इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेऊ शकतात. देशभरात भाजप आणि मोदी लाट दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 371 ते 401 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला 109 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 28 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय न्यूज 24 टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसारही एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला 335 ± 15 जागा मिळू शकतात, तर एनडीए आघाडीला 400 ± 15 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणात काँग्रेसला 50±11 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, इंडिया आघाडीला 107 ± 11 जागा आणि इतरांना 36 ± 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे.















Discussion about this post