नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीत तुतारी घेऊन मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणीमुळे मोठा फटका बसला. यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत पिपाणीचा धोका टाळण्यासाठी शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेत एक पत्र लिहिलं आहे. यात निवडणूक चिन्हाबाबातचा उल्लेख करण्यात आला आहे.
आयोगाला दिलेल्या पत्रात काय म्हटलं?
‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून काढून टाकावं. या चिन्हामुळे राष्ट्रवादी पक्षाचं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं नुकसान झालं आहे, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे या बाबात निर्णय घ्या. अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे
शरद पवार गटाचा दावा काय?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूक ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं म्हणणं आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार होती मात्र ‘पिपाणी’ चिन्हामुळे ती जागा हातातून गेली, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि ‘पिपाणी’ या चिन्हांमध्ये साधर्म्य आहे. यामुळे सामान्य लोकांना यातील फरक लवकर लक्षात येत नाही. यामुळे नुकसान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून शरद पवार गटाने याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे.
अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही त्यांनी दावा सांगितला. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आलं आहे.















Discussion about this post