नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीला आता काही महिन्याचा काळ राहिला आहे. २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकारने आतापासूनच कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एक मोठा फेरबदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये केंद्रिय मंत्री किरेन रिजिजू यांना कायदेमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांना कायदे मंत्री पदाचा कारभार देण्यात आला आहे.
दरम्यान, किरेन रिजीजू हे कायदा मंत्री झाल्यापासून वादग्रस्त ठरले होते. त्यांची अनेक विधाने आणि निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे भाजप पक्षाची प्रतिमाला फटका बसत असल्याचेही बोलले जात होती. सातत्याने वादात अडकल्यामुळे रिजीजू यांचं पद जाणार असल्याची शक्यता आधीच वर्तवली होती. त्यानुसार आज तडकाफडकी त्यांच्याकडून कायदा मंत्रीपद काढून घेण्यात आलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल..!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी दिली आहे. आता किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रालयातून भूविज्ञान मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तर रिजिजू यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांना हे खाते देण्यात आले आहे. अर्जुन राम मेघवाल आता त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.