जळगाव । एरंडोल तालुक्यातील खडके येथील आश्रमशाळेतील मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन जळगाव जिल्ह्यातील तिनही मंत्री आणि प्रशासनावर टीका केली आहे. या घटनेला चार महिने उलटले तरी बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आलेली नाही. अथवा कुठलीही कारवाई करण्यात येत नाही.
या प्रकरणात समितीच्या सदस्यांना सरकार पाठीशी घालत आहेत. तीन-तीन मंत्री असून जर मुलींना न्याय मिळत नसेल तर हे मंत्री काय कामाचे असा सवाल त्यांचे नाव घेता रोहिणी खडसे यांनी केला आहे.
खडके येथील एका आश्रमशाळेत तब्बल पंधरा ते वीस अल्पवयीन मुली आणि मुलांवर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणानंतर बालकल्याण समीत सदस्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर चार महिने लोटूनही बालकल्याण समिती बरखास्त केलेली नाही. किंवा तिच्या सदस्यांचे निलंबन किंवा अन्य कोणतीही कारवाई झालेली नसल्याने या मुलींना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी हे प्रकरण एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून आपण हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील तीन मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तसेच त्यांच्या वरदहस्तामुळे बाल कल्याण समितीच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी तीन-तीन मंत्री असताना जर मुलींना न्याय मिळत तर हे मंत्री काय कामाचे असा सवाल मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांचे नाव न घेता केला आहे.
Discussion about this post