जळगाव– बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर “राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे बाबतचे आदेश शासनाने एका निर्णयाद्वारे पारित केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व खाजगी व शासकीय शाळांनी याची अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी केली आहे.
शासन निर्णयाची जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते तथा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव जिल्ह्यातील खाजगी व शासकीय शाळांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संबंधित शासन निर्णयाच्या प्रती शाळांमध्ये पोहोचवणार असून सुरक्षा उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी अशा आशयाचे पत्र शाळेतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांना देणार आहे.
शाळेच्या परिसरातील मोक्याच्या ठिकाणी व शाळेत सीसीटीव्ही बसवणे , सीसीटीव्ही फुटेज ठराविक दिवसांनी मुख्याध्यापकांनी तपासणे, आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास स्थानिक पोलिसांना याबाबत कळवणे, शालेय कर्मचारी नियुक्त करताना काळजी घेणे, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल बस चालक, रिक्षा चालक यांची पोलीस चरित्र पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाकडून प्राप्त करणे, नेमणुकीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती छायाचित्रासह स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देणे, सहा वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, तक्रारपेटी बनविणे अशा तरतुदी उपरोक्त शासन निर्णयामध्ये करण्यात आलेल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी सर्व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते याबाबत आपापल्या परिसरातील शाळांवर लक्ष ठेवून असतील.याबाबतचा अहवाल पक्ष अध्यक्ष राज ठाकरे,व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना देतील अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी दिली आहे.















Discussion about this post