पुणे । वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर सध्या अडचणीत सापडले आहे. त्यांच्यावर हगवणे कुटुंबीयांना मदत केल्याचा आरोप होत असून अशातच आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुपेकरांवर 300 कोटींची लाच मागितली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता आणखी एका नेत्याने रेट कार्ड दाखवत सुपेकरांवर धक्कादायक आरोप केले आहे.
जालिंदर सुपेकर यांनी आरोपी हगवणेंना खोट्या माहितीच्या आधारे शस्त्र परवाना दिल्याचा आरोप आहे. तर, वैष्णवीच्या पालकांनी सुपेकरांची धमकी देत हगवणेंनी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुरेश धस यांनी सुपेकरांवर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली.
बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांनी धक्कादायक आरोप केले. सुरेश धस यांनी म्हटले की, वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.
जालिंदर सुपेकर यांच्यावर आता माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आरोप केले आहेत. दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी 1200 रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
राजू शेट्टी यांनी तुरुंगातील भ्रष्टाचारावर थेट बोट ठेवत खळबळजनक दावे केले आहेत. राजू शेट्टी यांनी म्हटले की, राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिकाऱ्यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम, काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास 40 ते 60 टक्के तफावत होती, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.
Discussion about this post