जळगाव । गेल्या चार वर्षांपासून ऐन काढणीच्या वेळेसच अतिवृष्टी होत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र यंदा सोयाबीन काढण्याच्या वेळेस पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी सोयाबीनचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सोयाबीनला चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यंदा आता सोयाबीनला ४१०० ते ४३०० पर्यंतचा भाव मिळत असून, आगामी महिनाभरात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. शासनाकडून सोयाबीनला ४६०० रुपयांपर्यंतचा भाव निश्चित केला आहे. तेवढा भाव शेतकऱ्यांना मिळण्याची मागणी केली जात आहे. मात्र, सद्यस्थितीत बाजारात हमीभाव एवढा भाव देखील मिळत नाहीय.
२०२१ मध्ये सोयाबीनला विक्रमी ९ ते ११ हजारांचे दर मिळाले होते.गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, गेल्या वर्षापासून सोयाबीनचे दर वाढताना दिसून येत नाही. जिल्ह्यात गेल्या वर्षी २५ हजार हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. मात्र यंदाच्या खरीप हंगामात घट दिसून आली. यावर्षी १८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे.
Discussion about this post