जळगाव । अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील 3-4 दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.तसेच आज सोमवारी जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय.
आज जळगाव जिल्ह्यासह काही जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
तिकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळणार आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस कोसळणार शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय.















Discussion about this post