जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाचा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज जळगाव जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान मध्यम ते हलका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे शहरात सूर्यदर्शन झाले नाही. पहाटेपासून वातावरणात गारठा जाणवत होता. सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अवकाळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे.दरम्यान येत्या आठवडाभरात अवकाळीची शक्यता असल्याने शेती पिकांच्या उत्पादनांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. २९ नोव्हेंबरनंतर नियमित हिवाळा सुरू होईल. यंदा हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात पारा १० अंशांपर्यंत घसरणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.















Discussion about this post