जळगाव । महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) साठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पक्षाचे युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांनी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना उद्देशून आपले अधिकृत राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “वैयक्तिक कारणांमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी कायम ऋणी राहीन. जिल्हा, तालुका आणि स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार.”
फेसबुक पोस्टमुळे खळबळ
केवळ वरिष्ठ नेत्यांकडे राजीनामा न देता विश्वजीत पाटील यांनी हे पत्र फेसबुकवरही पोस्ट केले आहे. त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. “पक्षाचे काम करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मला माफ करावे,” असे भावनिक आवाहन त्यांनी सोशल मीडियावर केले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने युवकांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. विश्वजीत पाटील हे ग्रामीण भागात सक्रिय आणि प्रभावी युवक नेते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी पद सोडल्याने ग्रामीण भागातील पक्ष संघटनेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, विश्वजीत पाटील यांचा पुढील राजकीय निर्णय काय असेल, ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार की राजकारणातून अल्पविश्रांती घेणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.















Discussion about this post