जळगाव । हॉटेलमधून जेवण करून घरी परतणाऱ्या मित्रांवर काळाने झडप घातली. भरधाव कारचा ताबा सुटल्याने थेट झाडावर आढळल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिरसोली गावाजवळ घडली. या अपघातात इतर ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आनंदा शांताराम सोनवणे (वय-३९ रा. कासमवाडी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
कासमवाडी परिसरात आनंदा सोनवणे हा दोन भाऊ, आई-वडील, पत्नी, दोन मुलांसह वास्तव्याला होता. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो काम पाहत होता. दरम्यान रविवारी १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तो त्याचा मित्र भैरव भगवान राणे, पप्पू आढाव, योगेश रेंभोटकर यांच्यासोबत कारने शिरसोली गावाजवळील कारने मारुती सुझुकी डिझायर क्रमांक एमएच १९ सी झेड १२१२ ने एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता.
दरम्यान जेवण आटोपून कासमवाडी येथे येण्यासाठी निघाले असता दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुलाबराव देवकर कॉलेजच्या पुढे एका झाडावर त्यांची कार आदळली. या भीषण अपघातात आनंदा सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले भैरव राणे, पप्पू आढाव, योगेश रेंभोटकर हे गंभीररित्या जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मित्रपरिवार व नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. घटनेबाबत महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.
Discussion about this post