जळगाव । जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे युरिया टंचाईबाबत सातत्याने तक्रारी येत असताना कृषी विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मोठा साठा उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांना “खत उपलब्ध नाही” असे सांगितले जात असताना सहा दुकानांमध्ये तब्बल ३४१८ गोण्या युरियाचा साठा आढळल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
लहुराज विश्राम मराठे, जितेंद्र परशुराम तांदळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विभागाकडे लेखी तक्रार सादर केली होती. त्यानंतर कृषी विभागाचे पथक कासोद्यात दाखल झाले. पथकात जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विकास बोरसे आणि तालुका गुणवत्ता नियंत्रक निखिल टोळकर यांचा समावेश होता.
यादरम्यान कृषी विभागाच्या पथकाने गावातील सर्व खत विक्रेत्यांच्या दुकानांसह गोदामांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान साठा नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध खतामध्ये मोठी तफावत आढळून आली. सहा दुकानांमध्ये तब्बल ३४१८ गोण्या युरियाचा साठा आढळून आला आहे. तर काही ठिकाणी विक्री नोंदवही अपूर्ण असल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या नावावर संशयास्पद बिले आढळल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
प्राथमिक चौकशीनंतर संबंधित विक्रेत्यांविरुद्ध आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी ठाम मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत केंद्रांमधूनच खत खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.















Discussion about this post