जळगाव : विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल २३० जागांवर यश मिळाले. तर महाविकास आघाडीला अवघ्या ५० पेक्षाही कमी जागा मिळविता आल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाले असले तरी अद्यापही सत्तेस्थापनेचा तिढा सुटलेला नाहीय. यातच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आमच्या महायुतीत नसता तर आम्ही शिवसेना शिंदे गटाने शंभर जागा जिंकल्या असत्या, असा दावा माजी पाणीपुरवठा मंत्री तथा शिंदे गटाचे नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाटील यांनी अजित पवार गटावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट विधानसभा निवडणुकीत एकूण 85 जागांवर लढला आणि 57 उमेदवार निवडून आले. महायुतीत अजित पवार आमच्यामध्ये नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या. परंतु महायुतीने अजित पवारांना घेतल्यावर आम्ही विरोध केला नाही. एकनाथ शिदे यांनी भाजपला तुम्ही अजित पवारांना का घेतलंत? असा प्रश्न विचारला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
महायुतीत मिठाचा खडा टाकू नका : मिटकरी
अजित पवार नसते तर शिंदे गटाच्या 90 ते 100 जागा आल्या असत्या हा गुलाबराव पाटील यांचा गोड गैरसमज आहे. त्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.















Discussion about this post