आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारकडून नवनवीन योजनांची घोषणा केली जात आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने सुरु केली असून यायोजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. यानंतर सरकारने लाडका भाऊ योजना आणली. या दोन योजनेनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना आणली. त्यात शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्यात येणार आहे.
राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी काढण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान ही योजना लागू राहील. ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
योजनेला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जीआरमध्ये म्हटले आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज मोफत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केला होता. या वीज बिल माफीसाठी येणारा खर्च राज्य सरकार उचलेल. त्या पोटी राज्य सरकार महावितरणला १४ हजार ७६० कोटी रुपयांचे अनुदान दरवर्षी देणार आहे. २८ जून रोजी केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी सरकारने एक महिन्याच्या आतच केली आहे















Discussion about this post